कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार !

कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार !

मुंबई – राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना खरीपाच्या बी-बियाणे खरेदीसाठी अडचण येऊ नये, यासाठी कर्जमाफी होईपर्यंत 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली होती. सरकारनेही ही मागणी मान्य केली असून शेतकऱ्यांना 10 हजार रूपयांची तातडीची मदत देऊ केली आहे. यामुळे  सरकारच्या तिजोरीवरही भार येणार नाही. मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी बॅंकांशी बोलून या निर्णयाची अंमलबजावणी करतील.  खरीपासाठी बी-बियाणे घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्जमाफीची घोषणा जरी करण्यात आलेली असली तरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या प्रस्तावाचा तपशील ठरविण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी लागणार असून मंत्रिमंडळापुढे पुढील आठवडय़ात त्याबाबत प्रस्ताव सादर होईल.
 

COMMENTS