नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान; अमेरिकेतील मॅगझिनचा दावा

नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान; अमेरिकेतील मॅगझिनचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा सर्वात मोठा फसलेला प्रयोग होता, अशी टीका अमेरिकेतल्या एका मॅगझिनने केली आहे. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था इतिहासातले सर्वात मोठे नुकसान सहन करत आहे, असेही या मॅगझिनने नमूद केले आहे. 500 आणि 1000  रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला खिळ बसली आहे.  आजवरचे सगळ्या मोठे नुकसान या एका निर्णयामुळे झाले असल्याचे या अंकात म्हटले आहे.

आपल्या चुकीच्या निर्णयातून मोदी सरकारने आता धडा घेतला पाहिजे, असे फॉरेन अफेअर्स या मॅगझिनमधील लेखात नमूद करण्यात आले आहे. लेखक जेम्स क्रेबट्री यांच्या हवाल्याने नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.

क्रेबट्री हे सिंगापूरच्या के ली कुआन यू स्कूलचे वरिष्ठ रिसर्च फेलो आहेत. त्यांनी आपल्या लेखात नोटाबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आर्थिक प्रगती होण्यासाठी काही बदल करण्याचे ठरवले आहे. ते बदल स्वागतार्हही आहेत. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय जनता निराश झाली आहे. छोट्या व्यावसायिकांसाठी नोटाबंदीचा निर्णय सपशेल फसला आहे.2017 च्या सुरूवातीला आलेल्या विकास दराचे आकडेच नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे समोर आणत आहेत. आता 2019 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आपल्या नोटाबंदीच्या निर्णयातून ठोस धडा घेतला पाहिजे, असेही या क्रेबट्री यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

नोटाबंदीचा निर्णयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी विरोध केला होता. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खिळ बसल्याचीही टीका त्यावेळी झाली होती. आता अमेरिकेतल्या मॅगझिननेही हीच बाब अधोरेखित करत पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय पूर्णपणे फसल्याचे म्हटले आहे.

COMMENTS