मीरा-भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर

मीरा-भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर

मुंबई – मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. तर 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अशी माहिती  राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

सहारिया यांनी सांगितले की, मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत 27 ऑगस्ट 2017 रोजी संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 26 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. 3 ऑगस्ट 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 पर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना 7 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

मीरा भाईंदर एक दृष्टिक्षेप

  • एकूण लोकसंख्या- 8,09,378
  • मतदार (सुमारे)- 5,93,345
  • एकूण प्रभाग- 24
  • एकूण जागा- 95 (महिला 48)
  • सर्वसाधारण- 64 (महिला 32)
  • अनुसूचित जाती- 4 (महिला 2)
  • अनुसूचित जमाती- 1 (महिला 1)
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग- 26 (महिला 13)

जि.प. आणि पं.स. च्या रिक्त पदांसाठी मतदान

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

 

 

COMMENTS