मुख्यमंत्र्यांचे वरातीमागून घोडे !  तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर करण्याचे आदेश….

मुख्यमंत्र्यांचे वरातीमागून घोडे !  तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर करण्याचे आदेश….

मुंबई – तूर खरेदी केली जात नसल्यामुळे शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी तूर पावसात भिजल्यानंतर आता मुख्यमंत्र्याना तूर खरेदीचं महत्व अधिक पटल्यासारखं दिसंतय. येत्या पाच ते सहा दिवसांत अतिरिक्त यंत्रणा राबवून तसेच दोन पाळ्यांमध्ये (Shift) काम करून उर्वरित तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान दिले.

तुरीला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तूर व तूर डाळींचे भाव किफायतशीर व स्थिर राहावेत यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यातील तुरीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रांवर उर्वरित नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी प्रक्रिया सुरू असून ती येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. असा दावा सरकारपर्फे केला जातोय.

उर्वरित तुरीची गतिमान पद्धतीने खरेदी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याचे लक्षात घेऊन खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. धारणीमध्ये अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आले असून आता एकूण 11 केंद्रांवर खरेदी सुरू आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर दहा वजनकाटे ठेवण्यात आले आहेत. पुरेशा प्रमाणात ग्रेडर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागातील पर्यवेक्षक तसेच सहाय्यक निबंधक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून तुरीचे जलद ग्रेडेशन करून खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बारदाण्याची पुरेसी व्यवस्था करण्याचे तसेच साठवणुकीसाठी खाजगी गोदामांचे अधिग्रहण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

COMMENTS