शिवसेनेचे दुटप्पी राजकारण चालू आहे – अजित पवार

शिवसेनेचे दुटप्पी राजकारण चालू आहे – अजित पवार

सोलापूर – ‘शिवसेनेचे दुटप्पी राजकारण चालू आहे. सत्तेत असून सरकार विरोधात आंदोलनही करते. स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर अशा सत्तेला लाथ मारून बाहेर पडले असते. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ती धमक नाही. आपले आमदार पक्ष सोडून जातील की काय? अशी भीती त्यांच्या मनात  आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. आज सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अजित पवारांनी यावेळी भाजपावर निशाना साधाला. ‘जनतेने भाजपला मोठ्या विश्वासाने निवडून दिले पण आता सर्वच नाराज आहेत.  सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळते. सीमा भागातले लोक कर्नाटकात जातात आणि तिकडून पेट्रोल भरून येतात. ही अवस्था भाजपने केली आहे. या सरकारने गोरगरिबांची साखरच काढून घेतली. हेच का अच्छे दिन? भाजप-शिवसेनेमुळे राज्याला वीजेची टंचाई होत आहे. कोळशाचा स्टॉक भरला नाही म्हणून राज्यात भारनियमन होत आहे. राज्यात गुंतवणूक थांबली, रोजगार उध्वस्त होत आहे. हे या सरकारचे अपयश आहे. विकास दर घसरला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना दम दिला जात आहे. सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहणाऱ्यांवर केसेस टाकल्या जातात. आम्ही सरकारमध्ये असताना असे कधीच घडले नाही. भाजपवर सोशल मीडियाचा उलटा प्रभाव झाला आहे. याचा विचार करत जनतेला आता आपण सावध करायला हवे. या सरकारची अधोगती सुरू झाली आहे.’ असे पवार म्हणाले.

‘आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. राज्यातील मंत्री शेतकऱ्यांना बोगस म्हणतात. जे मंत्री शेतकऱ्यांना बोगस म्हणतात ते स्वतः बोगस आहे. त्यांचा पक्षही बोगस आहे. नाशिकमध्ये ऑक्जिन अभावी लहान मुलांना जीव गमवावा लागला. या सरकारवर ३०२चा गुन्हा का दाखल करू नये? मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत सरकारने कपात केली. त्यांनी शिक्षण घेऊ नये यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे का?’  असा सवालही त्यांनी केला.

COMMENTS