शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेवून शेतकरी मंचावर

  शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेवून शेतकरी मंचावर

नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका भाषणाची सुरुवात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या अस्थींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या एका नातेवाईकाने या अस्थी मंचावर आणल्या आणि यानंतर सगळे सभागृह उभे राहीले.

अतिशय भावूक वातावरणात या शेतकऱ्याच्या अस्थींसमोर श्रद्धांजली वाहण्यात आली. हा प्रसंग इतका भावूक होता की उभ्या असलेल्यापैकी अनेकांचे डोळे पाणावले. यानंतर शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी सटाण्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कल्याणी ठाकरे यांनीही आपले मत मांडले. “बाळ ९ महिन्याचे असताना नवऱ्याने आत्महत्या केली. ५५ वर्षाची सासू कॅन्सरग्रस्त आहे. १५ लाखाचे कर्ज असताना एकट्याने आयुष्याचा संघर्ष करतेय” असे कल्याणी ठाकरे म्हणाल्या.

एका शेतकऱ्याच्या मुलीने, “आमच्या कन्यादानापर्यंत आमचा बाप जिवंत राहू द्या, आम्ही शाही लग्न लावायला आणि आलिशान इमारती बांधायला कर्जमाफी मागत नाही”, असे म्हणत कर्जमाफीची मागणी केली. शिवसेनेने नाशिकमध्ये मेळावा घेऊन समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा शेतकरी मेळावा भरवण्यात आला आहे. या मेळाव्याला सेनेच्या मंत्र्यांसह सेनेचे खासदार उपस्थित आहेत. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे या आशयाच्या टोप्या घातल्या आहेत. तर सरकारच्या निर्णयाविरोधी बॅनरही लावण्यात आले आहेत.

 

 

COMMENTS