सत्ताधारी पक्ष देशातील राजकारण कलुषित करतोय – शरद पवार

सत्ताधारी पक्ष देशातील राजकारण कलुषित करतोय – शरद पवार

देशातील राजकारण हे वाईट मार्गावर जात असल्याची चिंता आहे. सत्ताधारी पक्ष देशातील राजकारण कलुषित करून देशातील राजकारण सध्या वाईट वळण देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात पवार यांनी आपले मत व्यक्त केले. 

पवार म्हणाले, “मोदी सरकारने यूपीएच्याच काळातल्या अनेक योजनांची कॉपी केली आहे. आधार, मनरेगा, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर या गोष्टींवर भाजप विरोधात असताना टीका करत होती.”, असे पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशात मोठमोठी भाषणं देतात. आंतरराष्ट्रीय जगतात भारताचं स्थान वाढल्याचाही दावा केला जातो. पण त्याआधी यूनोचा रिपोर्ट पाहायला हवा, ज्यात अल्पसंख्यांकांवरचे हल्ले रोखण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप आहे. जबरदस्तीनं धर्मांतर होत असल्याचाही ठपका आहे.”

देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना,’पीक विम्याच्या नावाखाली 16 हजार कोटी रूपयांचा प्रीमियम भरला. मात्र, प्रत्यक्षात केवळ 7 हजार कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले. मग पीक विमा शेतकऱ्यांच्या फायद्याचा की विमा कंपन्याच्या?, असा सवाल पवारांनी विचारला. शिवाय, डाळींचं भरघोस उत्पादन होणार, हे माहिती असूनही निर्यातबंदी वेळेत उठवली नाही, अशी टीका पवारांनी केली.

‘मोदी सरकारचे दोन कोटी रोजगारांचे आश्वासन होते. एमएसपीवर 50 टक्के शेतकऱ्यांना देऊ असेही म्हटलेले. पण यातलं काहीच झाले नाही. शिवाय, गेल्या दोन वर्षात मिळून तीन लाख रोजगार उपलब्ध केले. मात्र, यूपीए काळात 2009 या एका वर्षात 10 लाख रोजगार दिले.’ असेही शरद पवार म्हणाले.

COMMENTS