“काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर ?”

“काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर ?”

काश्मिरमध्ये एका 8 वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. त्यावर विविध स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. सर्वसामान्य माणसापासून ते बॉलिवूडपर्य़ंत सगळ्यांनी या घटनेवरुन आपला संताप व्यक्त केलाय. मराठी अभिनेत्री सृहा जोशी हिनेही आपल्या भावनांना वाट करुन दिली…..

मला जे काही वाटतंय त्याने तसाही कसला बदल घडणार आहे? कुठली क्रांती येणार आहे ? आठ वर्षांचं ते ‘असिफा’ नावाचं लेकरू तडफडून मेलं. माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर काश्मीर नावाच्या देशात. हो देशच! पण मेली ती पोर. हाल-हाल होऊन मेली. मेल्यानंतर पण तिच्या चिंधड्या चिंधड्या करत राहिलो आपण सगळे… #JusticeForAsifa असे हॅशटॅग्स येत राहिले फक्तं. बाकी सगळं चालूच राहिलं तसंच. माझं शेड्युल, मिटींग्स, शुटिंग्स, डिनर्स, इन्स्टा स्टोरीज, नॅशनल अवॉर्ड्स… सगळं.. रोजचंच.. रोजच्यासारखंच.

पण या सगळ्यामध्ये ही बातमी ज्याक्षणी वाचली तेव्हापासून जो काय भीतीचा गोळा आलाय पोटात, तो जाता जात नाहीये. बलात्कार, वासनाकांड, लिंगपिपासा ही कधीही घृणास्पदच. त्याचं कुठलाही समर्थन असूच शकत नाही. कधीच! पण त्याला जो आणि ज्यापद्धतीचा सपोर्ट मिळतो आहे, ते ज्या पद्धतीने पाठीशी घातलं जातंय, तिरंग्याची देशप्रेमाच्या नावाखाली जी काय अंतयात्रा काढली जातीये, किंवा एकुणातच ही जी काही हिडीस दमनशाही चाललीये त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण? मुजोरपणाची किती टोकाची परिसीमा? आणि हा कसला बेशरम नंगानाच चाललंय आसपास??

मी खूप ठरवलं की यावर आपण बोलायचं नाही. व्यक्त व्हायचं नाही. काय फरक पडतो इतके सगळे लोक बोलत असताना मी नाही बोलले तर? आणि त्यातून सोशल मीडियावर तर नकोच. उगाच कशाला नसते वाद अंगावर घ्या! खूप प्रयत्न केला शांत बसायचा. पण खरं सांगू, ते फोटोमधले हसरे मोठे मोठे डोळे ना झोपूच देत नाहीयेत. विचित्र पाठलाग करतायत असं वाटतं सारखं.

काल एक ट्विट वाचलं, “अच्छा हुआ असिफा मर गई, बडी होती तो वैसे भी आतंकवादी हि बनती.” मी शप्पथ सांगते मला रडू आलं एकदम. यापेक्षा जास्त काय करू शकणार म्हणा. रडूच शकतो फक्त. पण हे रडू घाणीचं होतं. रागाचं, तिरस्काराचं, हताश वाटण्याचं, भीतीचं, सगळ्याचं. ही कुठली विषारी गोळी गिळलीये आपण समाज म्हणून ? सगळ्यांनी, एकत्र? असिफाला गोळी देऊन गुंगीत असताना बलात्कार केला तिच्यावर. आपलंही फार काही वेगळं नाहीये. ही गुंगीची गोळी देऊन अक्ख्या समाजावर वर्षानुवर्षं बलात्कार झालाय आणि ते मेंदू दगड घालून फोडलेत कोणीतरी! कुठलाही विषय आपण बेसिक संवेदनशीलतेने पाहू शकतच नाही! फक्त ओंगळवाणी, बीभत्स, किळसवाणी प्रदर्शनं मांडू शकतो. आपल्या भक्तीची, श्रद्धांची; देवाची. नुसती प्रदर्शनं.. नुसत्या आराशी!

साधं खरचटलं तरी दोन दिवस जोंबाळतो आपण स्वतःचा जीव. त्या एवढ्याश्या पोरीला काय झालं असेल? किती किती दुखलं असेल. शरीराच्या त्या भागाशी ‘शू’ करण्याव्यतिरिक्त ओळखही न होण्याचं वय ते…आपल्यासोबत हे काय होतंय कळायच्या आतच संपली ती. आणि संपली नाही सीधेपणानी.. गळा दाबून, दगडाने डोकं ठेचून संपवली तिला….

मला खरंच खूप भीती वाटतीये. की मी या अशा जगात राहतेय जिथे हे सगळं खूप नॉर्मल वाटतंय सगळ्यांना. किंवा माझ्या आसपासचे सगळेच पोटात ही भीती घेऊन वर नॉर्मलसीचा मुखवटा घालून जगतायत. हे तर फारच भीतीदायक आहे. आपल्याला सगळ्यांना या सप्रेशनने वेड लागेल कदाचित. किंवा लागलंही आहे ऑलरेडी! ‘आपले – त्यांचे’, ‘माझ्या जातीचे – त्याच्या जातीचे’ या सगळ्यात माझ्या बाई असण्याची आणि माणूस असण्याची जी ‘लक्तरं’ निघतायत; त्याने मी उभी आडवी नासवली जातीये.  दररोज.

मला झोप नाही लागतेय नीट रात्रीची. या अशा वातावरणाची, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि काही पर्याय नाही, म्हणून पाय ओढत जगत राहण्याची मला खरंच खूप, खूप जास्त भीती वाटतीये!

– स्पृहा जोशी.

COMMENTS