शेतकऱ्यांशी हा सरसकट विश्वासघात – डॉ अजित नवले VIDEO

शेतकऱ्यांशी हा सरसकट विश्वासघात – डॉ अजित नवले VIDEO

मुंबई – शेतकरी कर्जमाफीचा काढण्यात आलेल्या शासनादेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा आहे. शेतकऱ्यांना क्रूरपणे फसविले असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी केली आहे. शासनादेशाच्या पाचव्या कलमानुसार व्याज व मुद्दल मिळून दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आले आहे. मागील कर्जमाफीत अशा शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाखाची कर्जमाफी तरी होती. नव्या योजनेत दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्यांना सरसकट अपात्र करण्यात आले आहे. राज्यात बहुतांश शेतक-यांच्या शिरावर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने लाखो शेतकरी पहिल्याच अटीत अपात्र ठरविण्यात आले असल्याचं नवले यांनी म्हटलं आहे.

शिवाय योजना अटी शर्तींची नसेल असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मागील योजनेच्या बहुतांश सर्वच अटी शासनादेश काढताना आहे तशाच यावेळीही लावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांशी केलेला हा विश्वासघात आहे. अन्नदात्यांशी केलेली ही बेईमानी आहे. सरकारने हा शासनादेश त्वरित मागे घ्यावा व शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे विना अट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी किसान सभा करत असल्याचंही डॉ अजित नवले यांना म्हटलं आहे.

COMMENTS