कोरोनाविरोधातली लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे – अजित पवार

कोरोनाविरोधातली लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे – अजित पवार

मुंबई – कोरोनाविरोधाच्या लढ्यातील महत्त्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, कोरोनाविरोधाचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावं, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणं, संशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनेच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीने उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS