हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू,  ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना – अजित पवार

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना – अजित पवार

मुंबई – हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा जगण्याचा संघर्ष सोमवारी पहाटे थांबला. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती आज अपयशी ठरली.
पीडितेच्या मृत्यूनंतर हिंगणघाटमधल्या बहिणीला  नराधमाच्या हल्ल्यातून आणि नंतर मृत्यूमधून आपण वाचवू शकलो नाही ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संताप व्यक्त केला. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाटवासियांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दात आपला शोक व्यक्त करत त्यांनी आदरांजली वाहिली.

तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करणार असून समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. हिंगणघाट घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले.

काय आहे प्रकरण?

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरूणीनं आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.

ऑरेंज सिटी रूग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. आज सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेचा रक्तदाब कमी झाला. त्यातच ह्रदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS