भाजप हा देशाला जडलेला कॅन्सर, अशोक चव्हाणांची जोरदार टीका !

भाजप हा देशाला जडलेला कॅन्सर, अशोक चव्हाणांची जोरदार टीका !

अमरावती – भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या दुस-या दिवशी अमरावती जिल्ह्यात गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मोर्शी व चांदूर बाजार येथील विराट जनसंघर्ष सभेला संबोधीत करताना खा. चव्हाण यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, आ. यशोमती ठाकूर, आ. विरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, बबनराव तायवाडे, अनंतराव घारड, किशोर गजभिये, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, सचिव शाह आलम शेख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे माजी आ. नरेश ठाकरे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरूद्ध उर्फ बब्लू देशमुख आदी नेते उपस्थित होते.

खा. चव्हाण म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कर्जमाफीची घोषणा करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला पण अद्याप शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफी नाही म्हणून नविन पीक कर्ज मिळत नाही. शेतक-यांनी पीक विम्याचे हप्ते भरले पण विम्याची रक्कम काही मिळाली नाही. काही ठिकाणी विमा कंपन्यांनी शेतक-यांना १ रूपया, २ रूपये. ५ रूपये अशी भरपाई दिली. ही शेतक-यांची क्रूर थट्टा असून पीक विमा योजना शेतकरी लूट योजना झाली आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप वाया गेले आहे. रब्बीची पेरणी झाली नाही. लोकांना प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. आता स्वतः काय खायचे?पशुधन कसे जगवायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला म्हणून सरकारने दुष्काळ जाहीर केला. पण अद्याप दुष्काळी उपाययोजना सुरु केल्या नाहीत. राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. साडेचार वर्ष झाली पण मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच संपला नाही. राज्य चालवण्यात ते नापास झाले आहेत असे खा. चव्हाण म्हणाले.

राज्याच्या दुरावस्थेला भाजप इतकीच शिवसेनाही जबाबदार आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. साडेचार वर्षात काही काम केले नाही. जनतेतकडे जाऊन  मते मागायला तोंड नाही त्यामुळे आता रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून सुरु आहे. राज्यात रोज शेतकरी मरत असताना उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या वल्गना करत आहेत. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा पब्लिसीटी स्टंट होता असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला. एमआयएम ही भाजपची बी टीम असून राजकीय फायद्यासाठी भाजप हिंदू, मुस्लीम आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या कामात ओवेसी भाजपची मदत करत आहेत असे खा. चव्हाण म्हणाले.

गेल्या चार वर्षात भाजप शिवसेनेने भ्रष्टाचार आणि घोटाळे करून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला आहे. याच पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकून पुन्हा सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पैशाचा वापर करून लोकांना विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण आगामी निवडणुकांत विदर्भातील स्वाभिमानी जनता भाजपला पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

या सभेला मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. नोटाबंदीच्या तुघलकी निर्णयामुळे देशातील उद्योगधंद्यांची वाताहत झाली असून बेरोजगारी वाढली आहे. सरकारकडे आर्थिक नियोजन नसल्याने करवाढ करून लोकांची लूट सुरु आहे.

विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले की, राज्यातील भाजप शिवसेना सरकार विदर्भावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. सरकारने विदर्भातील शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व नसीम खान यांनीही यावेळी आपल्या भाषणांतून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका केली.

उद्या गुरुवार दि. 6 डिसेंबर रोजीचा जनसंघर्ष यात्रेचा कार्यक्रम

सकाळी 10.30 ते 12 वा. दर्यापूर येथे जाहीर सभा, दुपारी 1.30 ते 1.45 वा. मुर्तिजापूर येथे स्वागत, दुपारी 2.30 ते 4 वा. कारंजा येथे जाहीर सभा, सायं. 5 ते 7 वा. वाशिम येथे जाहीर सभा

COMMENTS