ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचाराची युती – अशोक चव्हाण

ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचाराची युती – अशोक चव्हाण

मुंबई – आज भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार  अफजल खान उर्फ अमित शाह व अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार उंदीर उर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, चौकीदाराच्या चोरीमध्ये आता सत्तेसाठी लाचार शिवसेना ही भागीदार झाली आहे. मातोश्रीवर येऊन अमित शाह यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाचे दात घशात घातले आणि सत्तेसाठी लाचार वाघाने आज अफजल खानासमोर गोंडा घोळलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांवर एक पुस्तिका काढली होती आज त्या पुस्तीकेच्या पानाची कागदी फुले तयार करून त्याचे तोरण अमित शाह यांच्या स्वागतासाठी मातोश्रींच्या दारावर लावले होते असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.

शिवाजी पार्कात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर सभेत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतरही वारंवार अनेक वेळा शिवसेना स्वबळावर लढणार असून भाजपशी युती करणार नाही अशा पोकळ घोषणा केल्या होत्या. युती गेली चुलीत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंनी स्वतःचा स्वाभिमान चुलीत घातला आहे आणि भाजपासमोर लोटांगण घातले आहे.

हा तमाम शिवसैनिकांचा अवमान आणि विश्वासघात आहे. मला फसवणूक झालेल्या या शिवसैनिकांबद्दल सहानुभुती आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तरी मोदींचे सरकार घालवण्यातच देशाचे आणि महाराष्ट्राचे हित आहे हे जाणणारा सामान्य शिवसैनिकही मोदींच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मतदान करतील असा विश्वास व्यक्त करून उद्धव ठाकरेंची ही बदलेली भूमिका पाहून सरड्यालाही स्वतःची लाज वाटली असेल. टायगर अभी लाचार है, असे खा. चव्हाण म्हणाले .

गेल्या साडेचार वर्षात भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी राज्याचे वाटोळे केले आहे. या राज्यातील १७ हजार शेतक-यांच्या आत्महत्यांना भाजपासोबत शिवसेना ही जबाबदार आहे. कुपोषणामुळे झालेल्या हजारो बालकांच्या मृत्यूला भाजपाइतकीच शिवसेना ही जबाबदार आहे. भाजप सरकारच्या काळात महिलांवरील वाढलेले अत्याचार, भ्रष्टाचार व   बेरोजगारींची समस्या हे भाजप आणि शिवसेना या दोघांचेही पाप आहे. आपण दोघे भाऊ महाराष्ट्राला लुटून खाऊ अशा पद्धतीने या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राला लुटले आहे.

अंगा लावूनिया राख।  डोळे झाकोनी करती पाप।

दावोनी वैराग्याची कळा। विषय भोगिती सोहळा।

तुका म्हणे ऐशा नरां। मोजोनी मारावे पैंजरा॥

संत तुकाराम महाराजांच्या विचारावर चालणारी राज्यातील जनता राज्याचे वाटोळे करणा-या शिवसेना भाजपा या दोन्ही नाठाळांच्या माथी येत्या निवडणुकीत काठी हाणून त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

COMMENTS