औरंगाबाद नामांतरावरुन साताऱ्यात मनसे आक्रमक

औरंगाबाद नामांतरावरुन साताऱ्यात मनसे आक्रमक

सातारा, – महाराष्ट्रात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीत एकमत नसून परस्पर विरोधी वक्तव्ये केली जात आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत एकमत नसल्याने भाजपाकडूनही राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी सातारामध्ये आंदोलन करून औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसवर फलकाला ‘छत्रपती संभाजीनगर’ असा फलक लावला आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, भाजप यांच्यासह मनसेनेही केली आहे. मात्र, या मागणीला काँग्रेसकडून विरोध दर्शवला जात आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. याचदरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा एसटी बस स्थानकावर आज दुपारी आंदोलन केले. तसेच औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसवर लावलेल्या फलकाला ‘छत्रपती संभाजीनगर’ असा फलक लावला. त्यामुळे बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा शहर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले.

COMMENTS