त्यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची, देशाचं भलं नाही – जितेंद्र आव्हाड

त्यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची, देशाचं भलं नाही – जितेंद्र आव्हाड

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला असून अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईत पेट्रोलने नव्वदी ओलांडली, राफेलच्या भडिमारातून पळताना मोदी सरकारच्या नाकी नऊ आले असताना जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भारत-पाक दुष्मनी हा संवेदनशील विषय नरेंद्र मोदींनी कावेबाजपणे निर्माण केला असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून टीका केली.

दरम्यान भाजप सरकारसाठी सत्ता महत्त्वाची आहे, देशाचं भलं नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत संयुक्त राष्ट्र संघटनेची आमसभा न्यूयॉर्कला होणार असून भारत आणि पाकिस्तानमध्ये ही भेट होणार होती. परंतु चार दिवसांपूर्वी अचानक ही भेट होणार नाही असं भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे जाहीर करण्यात आले. सीमा सुरक्षा दलाचा जवान नागेंद्र सिंग याचा गळा कापलेला देह आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मारलेला दहशतवादी बुरहान वानी याच्या स्मरणार्थ पाकिस्तान सरकारने छापलेली टपाल तिकिटे या पार्श्वभूमीवर ही भेट रद्द केल्याचे भारताने सांगितले. पण यात गडबड असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. आता भारत – पाकमध्ये सहा महिने चर्चा होणे अशक्य असून मोदी यांनाही तेच हवे होते. २०१९ पर्यंत उभय देशात वातावरण तापत ठेवणं ही त्यांची राजकीय गरज असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे.

 

COMMENTS