त्यावेळीही काँग्रेस राहणार नाही असेच चित्र होते, परंतु काँग्रेस आली – बाळासाहेब थोरात

त्यावेळीही काँग्रेस राहणार नाही असेच चित्र होते, परंतु काँग्रेस आली – बाळासाहेब थोरात

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी थोरात यांनी भाजपवर जोरदार टीका केली. १९७८ ला इंदिराजींचा पराभव झाला होता, त्यावेळी काँग्रेस राहणार नाही असेच चित्र होते, परंतु काँग्रेस आली.आता कठीण परिस्थिती आहे, दोन्ही ठिकाणी त्यांची सत्ता आहे, अशा वेळी काँग्रेसला उर्जित अवस्थेकडे न्यायचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. गरिबांच्या मनात आजही काँग्रेस आहे, ही लढाई तत्वांची, विचाराची आहे, दोन विचारांचा संघर्ष देशात सुरू असून जातीच्या, धर्माच्या नावावर राजकारण करणे सोपे असते, विचारसरणीने काम करणे अवघड आहे, काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. शेवटी शाश्वत विचारच कायम टिकतो. आताचे राजकारण बदलले आहे, पूर्वी काय बोलायचे आणि काय समोर आणले जायचे हे ठरलेले होते परंतु आता नको त्या गोष्टी समोर आणण्याची मानसिकता बनली असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.

दरम्यान सात निवडणुका मी जिंकल्या मंत्री म्हणून मी काम केले, महाराष्ट्रातले जिल्हे, मतदारसंघ माहीत आहेत. विरोधी नेते, कार्यकर्ते मला माहीत आहेत, मी महाराष्ट्रात खूप फिरलो आहे, त्याचा उपयोग मला पुढच्या काळात काम करताना होईल. आमची ताकत आमचा कार्यकर्ता आहे. लोकसभेला एकच खासदार आला, मग काय होणार असे प्रश्न विचारले जातात, परंतु असे होत असले तरी लोकसभा आणि विधानसभा या वेगळ्या असतात.मला खात्री आहे, महाराष्ट्रातील जनता वेगळा विचार करेल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान भाजप- सेनेच्या सरकारने भ्रामक वातावरण तयार केले आहे, पाच वर्षात राज्याची मोठी अधोगती झाली. पीक विम्यासाठी मोर्चा काढता तोही चुकीच्या कंपनीवर, सरकार तुमचे आहे तुम्ही नुकसान भरपाईची रक्कम का देत नाही? मी कृषिमंत्री राहिलो आहे, आम्ही प्रश्न समजून घ्यायचो, या सरकारने कधीही प्रश्न समजून घेतले नाही म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर झाले, शेतकऱ्यांना खरीपासाठी केवळ ३० टक्के कर्ज वाटप झाले आहे. आज बियाणे, मशागतीसाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. जो भास निर्माण केला आहे, त्याचा पर्दाफाश आम्हाला करायचा आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीत आघाडीतील मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, CPI, CPM वंचितला बरोबर घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत.मनसेचा अजून प्रस्ताव आला नाही, त्यामुळे चर्चा झाली नाही. वंचितच्याही मनात राज्यात आघाडीसोबत यावेत असे वाटत असावे असंही थोरात यांनी म्हटलं आहे. भाजपची राजनीती पाहिली तर सगळीकडे ते साम, दाम, दंड भेद करून यश मिळवत आहेत, काहीही करून कोणत्याही मार्गाने सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत, जे घडत आहे ते जनता पाहत आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपचे लोक खोट्या अफवा पसरवतात वातावरण प्रदूषित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, विरोधी पक्षातील लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून त्यांना हतबल करून ते आपल्याकडे ओढत आहेत, आणि ही पद्धत अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी बदल निश्चित वाटतोय. राज ठाकरे यांच्या सभा ऐकल्या. त्यांचं म्हणण सगळ्यांना पटलं पण त्याचे मतामध्ये परिवर्तन झाले नाही, यामुळे सगळीकडे शंकेचे वातावरण आहे,  निवडणूक आयोगाने ही शंका दूर केली पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशीच आमची भूमिका आहे.आम्ही एकत्र लढू आणि आमचाच मुख्यमंत्री असेल असंही थोरात यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS