राज्यात मे महिन्यात आतापर्यंत, 48 लाख 53 हजार 935 क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत, 48 लाख 53 हजार 935 क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

मुंबई – राज्यातील 52 हजार 422 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे 2020 मध्ये आता पर्यंत राज्यातील 1 कोटी 24 लाख 95 हजार 852 शिधापत्रिका धारकांना 48 लाख 53 हजार 935 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 422 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे 17 लाख 18 हजार 33 क्विंटल गहू, 13 लाख 18 हजार 420 क्विंटल तांदूळ, तर 18 हजार 361 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 4 लाख 16 हजार 197 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 4 मे पासून एकूण 51 लाख 2 हजार 470 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 2 कोटी 25 लाख 10 हजार 447 लोकसंख्येला 11 लाख 25 हजार 520 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्यात येते. या योजनेतून सुमारे 14,097 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन आता पर्यंत 6 लाख 91 हजार 960 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

COMMENTS