एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सवालावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहातच उत्तर !

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सवालावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहातच उत्तर !

मुंबई – पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात थेट सवाल केला आहे. ‘आपल्यावर झालेल्या एकाही आरोपात तथ्य निघालेलं नाही, मग आता सरकार त्या आरोप करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?’, असा थेट प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तसेच बेछूट आरोप झाल्यानंतर ज्याप्रकारे चौकशी केली जाते, त्याचप्रमाणे त्यात काहीही आढळलं नाही. तर आरोप करणाऱ्यांवर तातडीची कारवाई झाली पाहिजे.’ असं एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ खडसे यांना त्यांच्या प्रश्नावर सभागृहातच उत्तर दिलं आहे. ‘तथ्यहीन आरोप करुन लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील.’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकनाथ खडसेंवर भोसरीमध्ये स्वस्तात जमीन लाटल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे सभागृहात आणि सभागृहाबाहेरही ते पक्ष आणि नेतृत्वावर निशाणा साधत असल्याचं दिसून आलं असून आजही त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला आहे.

 

COMMENTS