जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन!

जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन!

मुंबई – गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे. सामाजिक भान ठेवत समाजोपयोगी कार्यक्रम राबवून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ, पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल.

आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान राज्यातील अनेक मोठ्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे, तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी यावेळी दिली. शिर्डी, सिद्धिविनायक आणि यासारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्याप्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

COMMENTS