शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, ‘या’ विषयावर झाली चर्चा !

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, ‘या’ विषयावर झाली चर्चा !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत पवार यांनी कोकणात कोणत्या भागात किती नुकसान झालं आहे, याची सखोल माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली असल्याचं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. अजूनही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्टींवर बैठकीत चर्चा झाली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नुकसानग्रस्त भागांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि मी स्वत: नुकसानग्रस्त भागात फिरत आहोत. मुल्यांकन करत असताना झाडांचं देखील मुल्यांकन करावं, ही भूमिका आम्ही घेतली आहे. येत्या चार ते पाच दिवसात नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून अतिशय सकारात्मक निर्णय घेतले जातील. या निर्णयांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास असल्याचंही सुनील तटकरे म्हणाले आहेत.

कोकणात पर्यटन हा व्यवसाय गेल्या तीन महिन्यांपासून बंद झाला होता. त्यामुळे पर्यटनाला कशी चालना देता येईल, मत्स्य व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंद्यांना कसा आधार देता येईल, फळबाग पुनर्जीवित कशा करता येतील, या सर्व गोष्टींवर बैठकीत सखोलपणाने चर्चा झाली असल्याचंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच वीज पुरवठा तातडीने कसा सुरु होईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. कारण वीज पुरवठा सुरु झाल्यावर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. काही ठिकाणी आम्ही जनरेटर दिले आहेत. परंतु, सगळ्याच ठिकाणी ते देणं शक्य नाही. त्यामुळे सर्वाधिक मनुष्यबळ लावून युद्ध पातळीवर विद्युत पुरवठा सुरु करावा याबाबत चर्चा झाली असल्याचंही तटकरे यांनी म्हटलं आहे.

बैठकीनंतर शरद पवार यांनी दिलेली माहिती

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत व पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा.

या भागातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली. जेणेकरून या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची वेळ आल्यास तेदेखील करावे लागेल.

चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करून, फळबाग लागवड योजनेशी त्याची सांगड घातल्यास हा मार्ग अधिक उपयुक्त ठरू शकेल अशी सूचना बैठकीदरम्यान केली.

या चक्रीवादळात घरे, बागा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घराच्या भिंती-छप्परे आणि झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. हे कचऱ्याचे ढिगारे साफ करून घरे, बागा व दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठे काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

अन्नधान्य पुरवठा विभागाकडून पीडितांना सध्या ५ किलो तांदूळ वा गहू आणि १ लिटर केरोसिन इतकी विनामूल्य मदत देण्यात येतेय. या भागातील विद्युत व्यवस्था पूर्ववत होण्यास महिन्याचा अवधी लागेल अशी माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक पीडित कुटुंबाला किमान ५ लिटर केरोसिन दरमहा देण्याची गरज आहे.

पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, हर्णे, दापोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज वाटते.

बहुतांश भागातील बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी तसेच नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरू होणे गरजेचे आहे. तसेच नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का हे पाहणे जरूरी आहे.

COMMENTS