औरंगाबाद, कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांची बदली, कचरा प्रश्न भोवला !

औरंगाबाद, कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांची बदली, कचरा प्रश्न भोवला !

औरंगाबाद – औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवलीचे महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. या दोघांचीही बदली कचरा प्रश्नावरुनच केली असल्याचं दिसून येत आहे. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांची बदली करण्यात आली आहे. 29 दिवसांनंतरही औरंगाबादमधील कचरा प्रश्न कायम आहे. त्यामुळे मुगळीकरांची बदली करण्यात आली असून त्यांना वैधानिक विकास महामंडळाचं सचिवपद देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दुसरीकडे, पी. वेलारासू यांनी कल्याण-डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न हाताळताना अत्यंत हलगर्जी दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या दोन्ही आयुक्तांना कचरा प्रश्न भोवला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान औरंगाबादमधील कचराकोंडीवरुन विरोधकांची आक्रमक भूमिका पाहता पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात याची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं होतं. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचऱ्याच्या गाड्या पेटवल्याने पोलिसांनी गावकऱ्यांच्या घरावर दगडफेक केली होती.

तसेच कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक रहिवाशांनी डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीची तक्रार केल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तर घर सोडून दुसरीकडे रहायला जा, असा अजब सल्ला आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या कल्याणकरांनी येत्या 19 मार्च रोजी वेलारासूंविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी शिवसेना नगरसेवकांसोबतही आयुक्त वेलारासू यांचा वाद झाला होता. शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. त्यामुळे त्यांची बदली करण्याचा निर्णय गेतला असल्याची माहिती आहे.

COMMENTS