काँग्रेसला धक्का, आजच्या बैठकीतच नांदेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !

काँग्रेसला धक्का, आजच्या बैठकीतच नांदेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !

मुंबई – लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आज टिळक भवन येथे काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसला धक्का बसला असून आजच्या बैठकीतच नांदेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा आढावा बैठकीतच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्यामुळे खळबळ उडाली आहे. नांदेडमधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. राजीनामे स्वीकारून नव्या नियुक्त्या कराव्यात अशी राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

आजच्या बैठकीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला असून या बैठकीला अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंग, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत विभागावर चर्चा होणार असून प्रत्येक विभातील आमदार, पदाधिकारी यांच्याकडून या बैठकीत आढावा घेतला जात आहे.

  • दरम्यान यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शिवसेनच्या दुष्काळ दौ-यावर टीका केली आहे. मान्सूनचे आगमन झाले आहे आणि आता दुष्काळ दौरा करतायत. या दुष्काळात किती जनावरं दगावली, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, लोकांच्या भावना काय होत्या याची कुणाला जाण नव्हती.आता पावसाळा सुरू झाला आणि दुष्काळ दौरा ही वेळ योग्य नाही. आधी देवदर्शन आणि नंतर दुष्काळ दौरा करतायत. अडचणीत सापडलेला माणूस त्याच्यात देव आहे, त्यांना आधी मदत केली पाहिजे. घोषणा खूप केल्या पण काहीही घडलेले नाही अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

COMMENTS