‘त्या’ जाहीरातींमधील निर्माते कलाकारांसह भाजपावर गुन्हा दाखल करा – काँग्रेस

‘त्या’ जाहीरातींमधील निर्माते कलाकारांसह भाजपावर गुन्हा दाखल करा – काँग्रेस

मुंबई – आचारसंहिता भंग व जाणिवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी झी टीव्ही, अॅन्ड टीव्ही या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ थांबवून भाभीजी घर पर है, तुझसे है राबता या मालिकांच्या निर्माते व कलाकारांसह भारतीय जनता पक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. परंतु यावेळी अत्यंत गंभीर अशा पेड न्यूजच्या धर्तीवर मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता केला जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भारतीय जनता पक्षातर्फे छुप्या मार्गाने मायावी तंत्र वापरून प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील तुझसे हे राबता व अॅन्ड टीव्हीवरील भाभीजी घर पर है या मालिकांमधील दृश्य पेन ड्राईव्हच्या माध्यमातून पुरावे म्हणून आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्ताकडे सोपवले आहेत असे सावंत म्हणाले.

सदर मालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची भलामण जाहिरातीप्रमाणे करण्यात आली आहे. याकरिता कुठेही जाहिरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधा-यांना लाभ मिळवून देण्याचा कुटील डाव यातून स्पष्टपणे समोर आला आहे. पेड न्यूज ही देखील याच प्रकारात मोडते. त्यामुळे पेड न्यूजच्या धर्तीवर या प्रकाराची नोंद घेऊन जनतेचा विश्वासघात तथा आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याबद्दल या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ बंद करून वाहिन्यांचे मालक, तसेच मालिकांचे निर्माते आणि कलाकारांसोबतच भारतीय जनता पक्षावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचीही चौकशी करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा ही अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सावंत म्हणाले की भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस हीन पातळी गाठत आहे. रामायणातील रावण आणि महाभारतातील कौरवांप्रमाणे मायावी आणि अनैतिक मार्गांचा वापर भाजपातर्फए सुरु करण्यात आलेला आहे. पंरतु अंतिमतः विजय सत्याचाच होत असतो या लढाईतही सत्याचाच विजय होईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिसन ओझा, डॉ. गजानन देसाई, प्रणव काळे यांचा समावेश होता.

COMMENTS