राज्यसभेसाठी काँग्रेसकडून ‘यांची’ नावं चर्चेत, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान भरणार उमेदवारी अर्ज !

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून ‘यांची’ नावं चर्चेत, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान भरणार उमेदवारी अर्ज !

मुंबई – महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असून विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. चार पैकी दोन जागा राष्ट्रवादीला, एक शिवसेना आणि एक जागा काँग्रेसला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान यांची नावं निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 11 मार्च रोजी शरद पवार आणि फौजिया खान मुंबई विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

काँग्रेसकडून यांची नावं चर्चेत

तसेच राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील, मुकुल वासनिक, राजीव सातव यांची नाव चर्चेत आहेत. याबाबत 9 मार्च रोजी बाळासाहेब थोरात दिल्लीत पक्षश्रेंष्ठीची भेट घेणार आहेत. त्यानंतर राज्यसभेसाठी एक नाव निश्चित होणार आहे.

26 मार्चला राज्यसभा निवडणूक

देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी म्हणजे 26 मार्चला संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल. महाराष्ट्रातील 7 जागांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.

COMMENTS