टाईप 2 विषाणू आढळलेल्या पोलिओ लसीच्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही – आरोग्यमंत्री

टाईप 2 विषाणू आढळलेल्या पोलिओ लसीच्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही – आरोग्यमंत्री

मुंबई – ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही, असे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान, उद्या दिल्ली येथे याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार पोलिओच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करत असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 45 ठिकाणांहून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. देशातील पाच मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये ते तपासण्यात आले असून सांडपाण्यासोबतच विष्ठा नमुने देखील नियमितपणे तपासण्यात येतात. दरवर्षी साधारणतः 75 हजार विष्ठा नमुने तपासण्यात येतात.

पोलिओ लसीकरणांतर्गत  करण्यात आलेल्या लसीकरणामुळे बालकांना कुठल्याही प्रकारच्या जोखीमीचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत असून ज्या कंपनीच्या पोलिओ लसीच्या उत्पादनात हा विषाणू आढळून आला त्याचा वापर केन्द्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात थांबविण्यात आला आहे. भारतामध्ये शेवटचा पोलिओ रुग्ण दि.13 जानेवारी 2011 मध्ये सापडला होता त्यानंतर तीन वर्ष एकही रुग्ण दाखल झाला नाही, त्यामुळे 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारताला पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आले. मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये केलेल्या  सर्वेक्षणात सांडपाणी व विष्ठा नमुन्यांमध्ये पोलिओच्या टाईप टू चे  विषाणू सापडले. याबाबत केलेल्या छाननीअंती हे विषाणू पोलिओ टाईप 2 लसीमध्ये मध्ये आढळल्याचे निदर्शनास आले आहे.

जगामधून टाईप टू असलेली पोलिओ लस वापरण्याचे एप्रिल 2016 पासून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे नियमित लसीकरण कार्यक्रम तसेच पोलिओ लसीकरण मोहीमांमध्ये t OPV  ( ज्यामध्ये पोलिओचे टाईप एक-दोन-तीन विषाणू असतात ) या लसी ऐवजी b OPV (ज्यामध्ये पोलिओचे टाइप 1 व 3 विषाणू असतात) ही लस वापरण्यात येत आहे. t OPV मध्ये असलेल्या तीन प्रकारच्या विषाणूंमुळे टाईप एक, दोन आणि तीन या वाइल्ड विषाणूंपासून बालकांचे संरक्षण होते. b OPV या लसी मध्ये दोन प्रकारचे विषाणू असतात आणि त्यामुळे टाइप 1 आणि 3 या वाईल्ड पोलिओ विषाणूंपासून संरक्षण मिळते. जागतिक स्तरावर टाइप 2 या वाइल्ड पोलिओ विषाणूचे निर्मूलन झाल्यानंतर b OPV लस वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार देशात पोलिओच्या लसीकरण मोहिमा b OPV लसीचा वापर करून राबविण्यात येत आहेत. 2018 मध्ये दोन राष्ट्रीय मोहिमा व इतर मोहिमा राबविल्या गेल्या आहेत.  त्यामध्ये बी ओपीव्हीचा (तोंडावाटे) वापर करण्यात आला.

टाईप टू पोलिओ विषाणू आढळल्यानंतर  केंद्र शासनाच्या चमूने तपासणी केलेली असून त्यात एका कंपनीने तयार केलेल्या  b OPV च्या कुप्यांमध्ये टाईप दोन प्रकारच्या लसीत विषाणू आढळून आला. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीचा वापर थांबण्याचा निर्णय 10 सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार राज्यातही दिनांक 11 सप्टेंबर पासून या लसीचा वापर थांबविण्यात आलेला आहे. केंद्र शासन हा विषय जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने गांभीर्याने हाताळत आहे. राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

COMMENTS