महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना ‘हेच’  माहित नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात !

महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना ‘हेच’ माहित नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात !

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.भाजपने राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव आंदोलना’ची हाक देत ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे. यावेळी केंद्राने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे 85 टक्के पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च किती येतो हेच माहित नाही अशी टीका केली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था, तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही का? आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. बारा बलुतेदारांवरही संकट आलं असून केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं.राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

तसेच सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही, रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

COMMENTS