बीड जिल्ह्यातील शेतकय्रांना दिलासा, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिला ‘हा’ आदेश!

बीड जिल्ह्यातील शेतकय्रांना दिलासा, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिला ‘हा’ आदेश!

बीड – कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे, येथून पुढे देखील सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

यावेळी राज्य सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग सह खबरदारी पाळत कापूस खरेदी केंद्रांवर येत्या २३ तारखेपासून कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश मुंडेंनी दिले. तसेच हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी दोन दिवसाच्या आत ग्रेडर नेमण्याचे आदेशही मुंडेंनी संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील हे उपस्थित होते.

पालकमंत्री मुंडे म्हणाले, करोणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगले काम झाले आहे परंतु येथून पुढे देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरील जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देत आहोत, या प्रसंगी योग्य ती काळजी घेतली जावी. इतर जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने प्रवासी जिल्ह्यात येऊ नये यासाठी देखील खबरदारी घेतली जावी असे ते म्हणाले. तसेच यासाठी पोलीस बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना केल्या.

 

मंत्री महोदयांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करताना कोणताही भेदभाव अथवा तक्रारी होऊ नये यासाठी लक्ष दिले जावे . अंबाजोगाई येथे कोरोना विषाणूचे नमुने तपासण्यासाठी लवकरच तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाचा आवारात सुरु होणाऱ्या केंद्रात काम वेगात केले जावे.

शेतकऱ्यांच्या बाबत देखील संवेदनशील राहून उपाययोजना केल्या जाव्यात , फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना विक्री करण्यासाठी अधिक सोयीस्कर निर्णयाची अंमलबजावणी केली जावे, शासनाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जावी असेही यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, रेशन कार्डधारकांसाठी मंजूर धान्य नियतन सर्व स्वस्त धान्य दुकानात पर्यंत पोहोचविण्यात आले आहे याच बरोबर साखर चे नियतन देखील जिल्ह्यात प्राप्त झाले असून एप्रिल ते जूनपर्यंते पात्र लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे. कोरोना विषाणूची नमुने तपासण्यासाठी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वतंत्र इमारत तयार होत असून त्यासाठी यंत्र व साहित्य सामग्री देखील लवकरच प्राप्त होत आहे.

पोलीस अधीक्षक श्री पोद्दार यांनी आज दुपारपर्यंत जिल्ह्यात 6740 ऊसतोड कामगार आले असल्याचे आकडेवारी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभार , डॉ .थोरात डॉ .पवार व श्री. आघाव पाटील आदींनी यावेळी माहिती सादर केली.

COMMENTS