देश परिवर्तन मागतो आहे, बीड जिल्ह्यातही परिवर्तन घडवा- धनंजय मुंडे

देश परिवर्तन मागतो आहे, बीड जिल्ह्यातही परिवर्तन घडवा- धनंजय मुंडे

परळी – मागील पाच वर्ष देशातील जनतेची सातत्याने फसवणुक झाल्यामुळे संपुर्ण देश आज परिवर्तनाची भाषा बोलतो आहे. बीड जिल्ह्यातही परिवर्तन घडवण्याची आवश्यकता असून, परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी होऊन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे, तर शेतकर्‍यांच्या हक्काचे ऊस गाळपाचे पैसे न देणार्‍या भाजपा नेत्यांना या निवडणुकीत धडा शिकवावा असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे यांनी केले आहे.

बीड लोकसभेतील आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी तालुक्यात आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे गाव संपर्क दौरा सुरू केला आहे. त्यावेळी ते बोलत होते. आज सकाळी दाऊतपूर येथून या दौर्‍याची सुरूवात करताना संगम, वाघबेट, ब्रम्हवाडी, इंदपवाडी, जिरेवाडी, तळेगाव, टोकवाडी, भोपला व कन्हेरवाडी या गावांमध्ये ते मतदारांच्या भेटी घेणार आहेत.

या दौर्‍यात ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील, जि.प.सदस्य बबनदादा फड, कृ.उ.बा.समिती माजी सभापती सुर्यभान मुंडे, उप सभापती विजय मुंडे, संचालक माणिकभाऊ फड, शंकरदादा नागरगोजे, मारोतराव फड, पं.स.उपसभापती पिंटु उर्फ बालाजी मुंडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, माऊली मुंडे, विकास बिडगर, रणजित चाचा लोमटे, कांता फड, राहुल कांदे, राजाभाऊ फड, गोविंद फड, बाबुराव बिडगर आदींसह गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील जनतेने दोन्ही बहिणींना भरभरून दिले, मात्र सत्तेच्या माध्यमातून जनतेला त्यांनी काहीच दिले नाही, सहानुभूती आणि भावनिकेतेच्या पलिकडे जाऊन यावेळी निवडणुक होण्याची आवश्यकता आहे. कायम संपर्कात राहणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या सर्व प्रश्‍नांची जाण असणार्‍या शेतकरी पुत्र बजरंगबप्पा सोनवणे यांना विजयी करावे. जनतेसाठी आम्ही हाडाची काडे करून झिजतो आहेत, आता मतरूपी आशिर्वाद देऊन त्याची परतफेड करावी, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

5 महिने होऊनही वैद्यनाथ कारखान्याने शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे दिले नाहीत, तुमच्या मदतीला न येणार्‍यांना मत देणार का ? असा सवाल प्रा.टि.पी.मुंडे यांनी केला व शेतकर्‍याच्या पोराला सर्वाधिक मताने लीड देऊन लोकसभेत पाठवा असे आवाहन केले. इथल्या लोकप्रतिनिधींनी लहान लेकरांची चिक्की खाऊन लेकारांच्या खाऊतही खाण्याचे पाप केले, असा टोलाही त्यांनी लगावाला.

COMMENTS