पंकजाताई तुम्ही कितीही व्यक्तिगत टीका करा, आम्ही पातळी सोडणार नाही – धनंजय मुंडे

पंकजाताई तुम्ही कितीही व्यक्तिगत टीका करा, आम्ही पातळी सोडणार नाही – धनंजय मुंडे

बीड – बीड जिल्ह्यासाठी ज्यांना काहीच काम करता आले नाही त्यांना प्रश्न विचारले की राग येतो आणि मग त्या व्यक्तीगत टीका करतात, मात्र पंकजाताई तुम्ही कितीही टीका करा आम्ही आमची पातळी सोडणार नाही मात्र जिल्ह्याचे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही असे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बीडच्या निलकमल हॉटेल येथे शहरातील वकील बांधवांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, युवक नेते संदीप क्षीरसागर, बीड वकील संघाचे अध्यक्ष अविनाश गंडले, अँड. ननवरे, अँड. पंडित, अँड. डी.बी.बागल, सुभाष राऊत, बबनराव गवते, अँड. संजय जठाळ उपस्थित होते.

देशातले चार स्तंभ धोक्यात आहेत, लोकशाही धोक्यात आहे. पत्रकारितेचे अत्यंत वाईट हाल या सरकार मध्ये आहेत; सरकार विरोधात लिहिणे सुद्धा अवघड झाले आहे. पुन्हा मोदी सत्तेत आले तर सत्तेतील लोकच म्हणत आहेत पुन्हा या देशात निवडणूक होणार नाही. मोदींची ही वर्तवणूक मोहम्मद तुघलकी असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

या निवडणुकीत भावनेवर जाऊ नका योग्य माणूस निवडा देशात आणि राज्यात येणाऱ्या काळात परिवर्तन होणार हे निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करतांनाच वकिलांच्या अडचणी जेवढ्या मला माहीत आहेत तेवढ्या कोणालाही माहीत नाहीत. राज्यात सरकार आल्यावर वकिलांच्या सर्व समस्यावर कायमचा तोडगा काढेल असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.

बीड जिल्ह्यातील सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे ही भावना आमची आहे. म्हणून आम्ही राजकारणात आलोत. एकदा संधी द्या सधन जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख निर्माण करू असे आश्वासन त्यांनी दिले. सामान्य माणसाने ही निवडणूक हातात घेतली आहे आपणही बजरंग बप्पाला वकिली आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठवा असे आवाहन केले.

COMMENTS