शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवण्याचे काम करणा-या सरकारचा चहा कसा घ्यायचा ? – धनंजय मुंडे

शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवण्याचे काम करणा-या सरकारचा चहा कसा घ्यायचा ? – धनंजय मुंडे

मुंबई –  चार वर्षांत फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला ठगवायचे काम केले आहे. जनतेला फसवणारे हे महाराष्ट्रातील ठग ऑफ महाराष्ट्र आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवण्याचे काम करणा-या सरकारचा चहा कसा घ्यायचा ? म्हणून सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलत असताना मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुष्काळाची घोषणा होऊन 21 दिवस झाले, कोणतीच उपाययोजना करत नाहीत, सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही, मुख्यमंत्री दुष्काळापेक्षा फ्लॅगशिप योजनांचा आढावा घेण्यातच धन्यता मानत आहेत. शेतक-यांना 50 हजार हेक्टरी मदत दिल्याशिवाय आम्ही कामकाज चालू देणार नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

तसेच मुख्यमंत्री दुष्काळी बैठकांचे केवळ नाटक करत आहेत ,त्याऐवजी त्यांनी बांधावर जावे.त्या शिवाय त्यांना दुष्काळाची दाहकता समजणार नाही. दुसरीकडे काही मंत्री विदेशात,काही अयोध्येत आणि काही मंत्री अंधारात दौरे करून चेष्टा करत आहेत. जनता दुष्काळात त्रस्त असतांना मंत्री मात्र व्यस्त असल्याची टीकाही यावेळी मुंडे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला 1 डिसेंबरचा मुहूर्त कशाला ? उद्याच अहवाल ठेवा आणि आरक्षण द्या धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल ठेवा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत भूमीका जाहीर करा अशी मागणीही आम्ही हिवाळी अधिवेशनात लावून धरणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

मुंबई शहर विकास आराखड्यात मोठा भ्रष्टाचार

 मुंबई शहर विकास आराखडा बिल्डरधार्जिणा आहे. या विकास आराखड्यात 108 पानांचे शुद्धीपत्रक कसे काढले,हा मोठा भ्रष्टाचार असून आम्ही तो उघड करु. जलयुक्त शिवार अभियान, लोकमंगल, पिकविमा, शिवस्मारक निविदेतील भ्रष्टाचार , मागील 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार मुद्दे आम्ही सभागृहात मांडणार अससल्याचंही मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात दुष्काळासह अनेक महत्वाचे प्रश्न असताना सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून पळपुटेपणा केला आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा यासाठीही आम्ही सोमवारी राज्यपालांना भेटणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

 

COMMENTS