शौर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन – धनंजय मुंडे

शौर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन – धनंजय मुंडे

मुंबई – पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रकार परिषदेत त्यांचं मनोगत व्यक्त केलं मात्र पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खोचक ट्विट करत टीका केली आहे.

५ वर्षे मूग गिळून बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषदेला संबोधित केलं.विशेष म्हणजे पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. या शौर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! गिनीज बुक रेकॉर्डवाल्यांनी याची आवर्जून नोंद घ्यावी असा टोला मुंडे यांनी लगावला आहे.

दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर निदान पुढच्यावेळी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमित शाह बोलू देतील असा खोचक ट्विटही केलं आहे. नरेंद्र मोदींची विचारसरणी हिंसेची असून गांधींच्या विचारांची नाही असा टोला यावेळी राहुल गांधींनी लगावला. तसेच २३ मे रोजी जनता जो निर्णय घेईल त्याच्या आधारे काम केलं जाईल, त्याआधी त्याच्यावर बोलू शकत नाही. जनतेच्या मताचा आम्ही आदर करतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS