शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही – धनंजय मुंडे

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही – धनंजय मुंडे

अंबाजोगाई (घाटनांदूर) –  राज्यात यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत देण्याची गरज आहे. ही मदत अधिवेशनापूर्वी न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.मुंडे मागील 4 दिवसांपासून दुष्काळी भागाचा दौरा, गावकर्‍यांशी चर्चा व शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी अंबाजोगाई तालुक्यताील घाटनांदुर व पट्टीवडगाव सर्कलमधील 42 पेक्षा जास्त  गावांमधील नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.

2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने हेक्टरी 25 हजार रूपये मदत दिली होती. यावेळी त्या वेळेपेक्षा यंदा अधिक बिकट परिस्थिती असल्याने यावेळी 50 हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलुन दाखवले. सदर मदत न मिळाल्यास अधिवेशन चालु न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.मागच्या वर्षीचे बोंडअळीची नुकसान भरपाई, वीज बील माफ, 100 टक्के कर्जमाफीची अंमलबजावणी आणि मागेल तिथे टँकर, दावणीला चारा आदी मागण्याही त्यांनी केल्या. बीड जिल्हा बँक शेतकर्‍यांच्या पीक विम्याच्या पैशांवर व्याज खात आहे. त्यांची ही कृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी जेष्ठ नेते किसनराव बावणे, मजुर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, माऊली जाधव, शिवहार भताने, बाळासाहेब देशमुख, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, मच्छिंद्र वालेकर, मुस्ताक पटेल, पांडुतात्या हारे, शिवाजीराव सिरसाट, बळवंतराव बावणे, बालासाहेब राजमाने, गंडले साहेब, चंद्रकांत वाकडे, विश्वंभर फड, सत्यजित सिरसाठ, धनंजय शिंदे, चंद्रकांत चाटे, काशिनाथ कातकडे व परिसरातील सर्व सरपंच , घाटनांदुर येथील ग्रा.पं. सदस्य, शेतकरी , नागरिक आदी उपस्थित होते.

हातात जेवणाचे ताट अन दुष्काळ ग्रस्तांसोबत फराळ..

विधान परिषद विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे हे सध्या दिवाळीत घरी दिवाळी साजरी न करता दुष्काळ ग्रस्त भागात फिरत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत . एका एका दिवशी तब्बल 40 -40 गावांमधील नागरीकांशी सहा सहा तास व्यक्तीगत संवाद  साधत आहेत . हे करतांना हातात ताट घेऊन जेवण आणि त्यांच्यासोबतच दिवाळी फराळ घेत आहेत.

COMMENTS