धनंजय मुंडे व राष्ट्रवादीच्या 7 तासाच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश !

धनंजय मुंडे व राष्ट्रवादीच्या 7 तासाच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश !

बीड, परळी – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज काढलेल्या धडक मोर्चा आणि 7 तासाच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या सोयाबीनच्या पीक विम्याचे पैसे 3 दिवसात देण्याचे तसेच वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले 25 ऑगस्ट पर्यंत देण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने मोर्चा व आंदोलनाची दखल घेवुन सकारात्मक प्रतिसाद दिल्याने 7 तासाचे भरपावसातील हे आंदोलन मागे घेण्यात आले.

o

सोयाबीनचा पीक विमा, वैद्यनाथ कारखान्याकडील बिले या दोन प्रमुख मागण्यांसह 14 मागण्यांच्या संदर्भात धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा धडक मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत धनंजय मुंडेंसह हजारो शेतकरी भर पावसातही 7 तास बसून राहिले, त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने तातडीने पावले उचलीत सर्व संबंधीत विभागांकडून या बाबत सकारात्मक प्रतिसाद मागवला. रात्री 07.30 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक, तहसिलदार पाटील, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी तपकीरे, कृषी विभागाचे अधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करीत असल्याबाबत लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लेखी दिलेल्या पत्रामध्ये सोयाबीन पीक विम्याबाबत प्रत्येक अर्जाची छानणी करून सदर पीक विम्याचे वाटप येत्या 3 दिवसात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले 25 ऑगस्ट पर्यंत अदा करण्याचे कारखान्याने कळविले आहे. दुबार पेरणीबाबत तलाठी व कृषी सहाय्यक यांना संयुक्तपणे स्थळ पहाणी करून 10 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. जिरायत व फळबाग अनुदान रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात येईल, परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम 3 महिन्यात पुर्ण करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात येतील, परळी बायपास रस्त्याचे काम वार्षिक आराखडा 2019 मध्ये समावेश करून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुर्ण केले जाईल, पाणी उपलब्ध होताच परळी औष्णिक विद्युत केंद्र सुरू केले जाईल, विद्युत मंडळाने दिलेल्या चुकीच्या बिलांची दुरूस्ती करून दिली जाईल, वीजेच्या तक्रारी दुर केल्या जातील, चांदापूर प्रकल्पावरून परळीस पाणी पुरवठा करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत, सरसकट कर्जमाफी, कृत्रिम पाऊस, वॉटरग्रीड योजनेत परळी तालुक्यातील प्रकल्पांचा समावेश, खडका धरणातुन परळी शहरास पाणी पुरवठा याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने 16 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले आहेत.

मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी प्रशासनाचे आभार मानले. मात्र लेखी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुर्तता न झाल्यास पुन्हा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री.मुंडे यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

*4 शेतकर्‍यांचे पावसात आंदोलन*

दरम्यान गोविंद होनमणे, सुग्रीव कदम, गजेंद्र मगर, विजयकुमार कदम या चार शेतकर्‍यांनी संपुर्ण 7 तास पावसात बसून, या आंदोलनात सहभाग घेतला. धनंजय मुंडे यांनी त्यांचे कौतुक करताना तेच आजच्या या आंदोलनाला मिळालेल्या यशाचे शिल्पकार असल्याचे सांगितले.

COMMENTS