राऊतांना बोलण्याचे लायसन्स मातोश्री की गोविंदबागेतून मिळाले – पडळकर

राऊतांना बोलण्याचे लायसन्स मातोश्री की गोविंदबागेतून मिळाले – पडळकर

सांगली – संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीवरुन मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या. शरद पवार यांच्या विषयी मी मध्यंतरी काही विधानं केली. तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र सांगतात. आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी पाहता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी, असं राहून राहून वाटते, अशी टिका भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना पत्र लिहून केली आहे.

सामना अग्रलेखात फेकूचंद असा उल्लेख केल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर आपलं पत्र शेअर केलं आहे.

पत्रात म्हटले आहे की, खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळं उधळली आहेत ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले की, ‘महाराष्ट्रात हुकूमशाही आणि आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे’.ौ

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करुन ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण न भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश. मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खांशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन. ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार.

 

COMMENTS