सरकारने शेतकऱ्यांची हत्या केली; शिवसेना नेते आंदोलकांच्या भेटीला

सरकारने शेतकऱ्यांची हत्या केली; शिवसेना नेते आंदोलकांच्या भेटीला

नवी दिल्ली: कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर काही संघटनांनी माघार घेतल्यामुळं आंदोलन थंडावेल असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा या आंदोलनानं जोर पकडला आहे. शिवसेनेनंही आता या आंदोलनाला नैतिक बळ देण्याचं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेचे खासदारांच्या शिष्टमंडळाने आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप शिवसेनेने व्यक्त केला. आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकऱ्यांचे मृत्यू नसून या शेतकऱ्यांच्या हत्याच आहे, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा खासदारांनी आज गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला हवा देण्यासाठीच शिवसेना खासदार शेतकऱ्यांना भेटल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS