राजकारणात येणार का?, इंदुरीकर महाराजांचं पत्राद्वारे स्पष्टीकरण !

राजकारणात येणार का?, इंदुरीकर महाराजांचं पत्राद्वारे स्पष्टीकरण !

अहमदनगर, शिर्डी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत इंदुरीकर महाराज यांनी स्वतः पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.

इंदुरीकर महाराजांचं पत्र

राम कृष्ण हरी..

“संगमनेर तालुक्यातील महाजनादेश यात्रेमध्ये मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलो नव्हतो. समाजासाठी माझं काहीतरी देणं लागते आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमांच्या दैनंदिन जीवनात मला समाजासाठी जी काही मदत करायची असती ती करता येत नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी स्वतः एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यासाठी संगमनेर गेलो होतो. मी कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनामध्ये ठेवलेला नव्हता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला व कुठल्याही पक्षाची मफलर गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो.

जर मला राजकारणात किंवा निवडणुकीत उतरायचे असते तर मी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिथेच थांबून राहिलो असतो परंतु मी मात्र समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. राजकारणात मी कधीही येणार नाही आणि संगमनेर तालुक्याचे नेतृत्व देखील खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे. माझ्या स्वतःच्या शाळेसाठी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनीच पहिली वर्गणी दिलेली आहे आणि आज देखील आमदार बाळासाहेब थोरात हे शाळेला नेहमी मदत करत आहेत. मी कधीही या गोष्टीचा विसर पडू देणार नाही.मी सर्व माझ्या हितचिंतकांना व व श्रोत्यांना सांगू इच्छितो की मी कधीही राजकारणात येणार नाही. समाजकार्याचा वसा मी हाती घेतलेला आहे तो माझ्याकडून चिरंतर सुरू राहील. त्यामुळे माझ्या संगमनेर विधानसभा उमेदवारीच्या काही बातम्या सुरू आहेत त्यांना मी आजच जाग्यावर पूर्णविराम देत आहे.

आपला,
-ह.भ.प निवृत्ती महाराज इंदोरीकर

COMMENTS