पाकिस्तानी साखर साठवलेली गोदामं पेटवून देणार – जितेंद्र आव्हाड

पाकिस्तानी साखर साठवलेली गोदामं पेटवून देणार – जितेंद्र आव्हाड

मुंबई –  साखरेचे दर कोसळत असतांना मुंबईच्या वेशीवर हजारो क्विंटल पाकिस्तानी साखरेच्या गोण्या दाखल झाल्याचं समोर येत आहे. ज्या गोदामात ही साखर ठेवली जाईल ती गोदामं पेटवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन झालेलं असताना पाकिस्तानी साखर आयात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान राज्यातील हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नव्हे, तर साखर चोळण्याचं काम मोदी सरकारने करत असून ही साखर विकत न घेण्याचं आवाहन आव्हाड यांनी  केलं आहे.तसेच ज्या गोदामात ही साखर सापडेल त्या गोदामाला आग लावण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. भारतीय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानची साखर आयात करण्याचं धोरण सरकारने आखलं आहे. मात्र ही साखर भारतात विकू देणार नसल्याचंही आव्हाड यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS