सावधान ! अंटार्क्टिकाचा बर्फ केरळात कोसळला, वाचा केरळातील प्रलयामागची कारणे !

सावधान ! अंटार्क्टिकाचा बर्फ केरळात कोसळला, वाचा केरळातील प्रलयामागची कारणे !

केरळमधील अतिवृष्टी व महापूरात शेकडो माणसे बळी गेली. आता पाणी ओसरत आहे. माणसांची सुटका करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. हानीचे प्रमाण समजत आहे. यात पैशांचा आकडा दिसत राहतो. सुमारे २००००  कोटी रूपयांचा आकडा सरकारला वाटतो.  केरळात १०० वर्षांतला मोठा पाऊस पडला असे म्हटले जाते. मुंबईतील २६ जुलैच्या पावसाबाबतही असेच म्हटले गेले. यात चूक होत आहे. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. वस्तुस्थिती ही आहे की, पावसाची नोंद ठेवण्यासच देशातील विविध भागांत पन्नास साठ ते शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी सुरूवात झाली. मात्र, पाऊस तर कोट्यावधी वर्षे पडत आहे.

केरळ, मुंबई किंवा जगात सध्या हाहाकार घडवणारा पाऊस हजारो, लाखो  वर्षांतील, न पडणारा पाऊस आहे. कारण सध्या पृथ्वीच्या तापमानात होत असलेल्या महाविस्फोटक वाढीशी त्याचा संबंध आहे. अशा वेगात होणारी वाढ कोट्यावधी वर्षांत झालेली नाही. अंटार्क्टिकाचे बर्फसाठे केरळात कोसळले आहेत. हजारो वर्षे अंटार्क्टिकाचे, दक्षिण ध्रुवाचे तापमान वर्षातील बहुतांश काळ शून्याखाली रहात होते. उणे ४०° से पर्यंतही खाली जात होते. सध्याही ते शून्याखाली सुमारे २५°से हवे होते. मात्र ते आता शून्यावर २५° से   असते. हा तापमानातील ५०° से किंवा जास्त अंशाचा अभूतपूर्व फरक आहे.

तीन ते सहा किलोमीटर जाडीच्या ( उंचीच्या ) बर्फाच्या थरांनी पूर्ण आच्छादलेल्या, भारताच्या काही पटीने क्षेत्रफळ असलेल्या या  खंडावरील बर्फाचे प्रचंड साठे झपाट्याने वितळत आहेत. ही, तसेच महासागरांच्या पाण्याची व पर्वतांवरील बर्फाची वेगाने होत असलेली अतिरिक्त वाफ थंडावा मिळाल्यावर ठिकठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी व बर्फवृष्टीच्या रूपात कोसळत आहे. सुमारे एक हजार घन किलोमीटर अधिकचा बर्फ दरवर्षी वितळत आहे.  काही दिवसांपूर्वी, महिन्याभराच्या पावसाच्या अभावानंतर नंदुरबारच्या काही भागांत एका तासात काही इंच या गतीने अकल्पित वृष्टी होऊन रंगावली व सरपणी या नद्यांना अचानक महापूर आला. मोठी आपत्ती कोसळली. असे जगभर घडत आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या, जर्मनीतील ‘बाॅन’ येथे झालेल्या अत्यंत महत्वाच्या परिषदेत दि.६ नोव्हेंबर २०१७ रोजी जागतिक हवामान संघटनेकडून जाहीर झाले की, वातावरणातील कार्बनने मर्यादा ओलांडली आहे. आता तापमान वाढतच राहणार आहे. तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. फक्त काही दशकांत मानवजात व जीवसृष्टीचे कायमचे उच्चाटन होणार आहे. पॅरिस करारात नमूद केलेली, स्वयंचलित यंत्राच्या आगमनाच्या म्हणजे सुमारे सन १७५० सालाच्या  तुलनेत सरासरी तापमानात २° से वाढीची मर्यादा सध्याच्या गतीने ३ वर्षात पार केली जाणार आहे. यापेक्षा महत्वाचे काहीही नाही. पण याबाबत मौन पाळून केरळच्या आणि इतर प्रत्येक दुर्घटनेचा अर्थ लावला जात आहे. विज्ञानाचा जयजयकार चालू असताना होणारे हे वर्तन अवैज्ञानिक आहे. सत्य लपवले जात आहे.

केरळच्या महापूराचा थेट संबंध कार्बनच्या उत्सर्जनाशी आहे. रोज पृथ्वीवर धावणा-या सुमारे दोनशे कोटी मोटारींशी आहे. परंतु प्रसारमाध्यमांतुन विशेषतः चित्रवाणी वाहिन्यांवर महापूराच्या थरारक बातम्यांमधील वेळात आलिशान मोटारींच्या, गगनचुंबी इमारती असलेल्या शहरांच्या जाहिराती चालू असतात. त्यामुळे दुर्घटनांच्या मूळाशी जाणारी खरी कारणे जनतेपर्यंत पोचत नाहीत.  ही अतिवृष्टी होत असताना मुंबईत माहुलच्या तेल शुध्दीकरण कारखान्यात ( रिफायनरी ) भयंकर स्फोट झाला. आग लागली. या भागातील तसेच शिवडी, वडाळ्याच्या तेल टाक्यांनी पेट घेतल्यास काय घडेल त्याची कल्पना करावी. मुंबई जळेल.

रिफायनर्यांनी  खनिज तेलावर प्रक्रिया करताना मोठे कार्बन उत्सर्जन होत असते. या  प्रक्रिया केलेल्या तेलावर वाहने चालतात. जगात दरवर्षी उत्सर्जित होणार्या १००० कोटी टन कार्बन डाय ऑक्साईड वायूपैकी ४५० कोटी टन वायू वाहनांमुळे उत्सर्जित होतो. यापैकी जवळजवळ ९०% उत्सर्जन  मोटारी (कार) करतात. जगात कोठेही धावणार्या वाहनांमुळे केरळ, मुंबई, चेन्नई, किंवा उत्तराखंडासारख्या  दुर्घटना घडतात. केरळमधील माणसे लाखोंच्या संख्येने अरब अमिरात  व इतर आखाती देशांत नोक-या करतात. संयुक्त अरब अमिरातीने ७०० कोटी रूपये मदत दिली याचे कौतुक झाले. पैसे स्वीकारण्यावरून वादही चालू आहे. पण हे लक्षात घ्यावे की अतिवृष्टी व महापूरही त्याच देशांतील तेलाच्या ज्वलनामुळे आहेत.

रिफायनर्यादेखील या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी आहेत. म्हणजे त्यांनी तेलाबरोबर व नोकर्यांबरोबर जगाला दुर्घटनांची निर्यातही केली. त्यांची कमाई हीच एक दुर्घटना ठरते. आता हे देश व अमेरिका कोकणात रिफायनरी करू पाहते. यांनी मानवजातीला नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. आपली जनताही मोटार बाळगण्याच्या शर्यतीत उतरून यास हातभार लावत आहे.

केरळातील या दुर्घटनेत २०००० किलोमीटर लांबीचे रस्ते उखडले गेले. निकामी झाले. हे रस्तेदेखील या दुर्घटनेची बीजे पेरत होते. या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. या रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत खंत करणे व त्यावरून वाहून जाणार्या आलिशान वाहनांना वाचवण्याचा प्रयत्न करणे हे हास्यास्पद आहे. कारण तुम्हाला नष्ट करणा-या गोष्टीला तुम्हीच वाचवत आहात. माणसे, जीवसृष्टी व पृथ्वीची जडणघडण यांना वाचवणे आवश्यक आहे. उद्योग, वीजनिर्मिती, खत – कीटकनाशक कारखाने, वाहने, सीमेंट काँक्रीटची बांधकामे, धरणे इ. ना वाचवणे नाही. नुकसानभरपाई व पुनर्निर्माणा   ची रूढ औद्योगिक शहरी कल्पना चालू राहिली तर यापेक्षा मोठ्या दुर्घटनांची खात्री बाळगावी. दुर्दैवाने ते घडत आहे.

धरणांमुळे यापेक्षा मोठी हानी टळली हा समज चूक आहे. उलट धरणांमुळे व त्यांना जोडलेल्या शेती व शहरी पध्दतीमुळे पिण्याचे असो की महापूराचे, पाण्याची समस्या बिकट झाली. पण ही गोष्ट कोट्यावधी वर्षांच्या पृथ्वीच्या किंवा दहा हजार वर्षांच्या कृषियुगाच्या पार्श्वभूमीवर तपासुन पाहिल्यासच कळेल.  कायदेशीर – बेकायदेशीर खाणकाम, वैज्ञानिक – अवैज्ञानिक डोंगरतोड, वैध – अवैध वाळू उपसा, या संकल्पना पृथ्वीच्या व जीवनाच्या दृष्टीकोनातुन  चूक आहेत.  पृथ्वीचा दृष्टीकोनच आपणास वाचवू शकतो. आधुनिक मानवकेंद्री नाही. नुकसान आर्थिक,  व जिवितहानी फक्त माणसाची, फार तर त्याने पाळलेल्या कोंबड्या, बकर्या, गायी, म्हशींची. पृथ्वीवर मानवाची आधुनिक  जीवनशैली, औद्योगिकरण ज्या विविध स्वरूपाच्या दुर्घटना घडवत आहे त्यात सर्व जीवसृष्टी नष्ट होत आहे. वणव्यांत, बर्फवृष्टीत, उष्णतेच्या लाटांत, महापूरात, वितळणार्या बर्फात, जीवसृष्टी नामशेष होत आहे.

माणसाने यंत्रयुगाचा पूर्ण त्याग केला व त्यापूर्वीची पृथ्वीशी सुसंगत राहणारी जीवनपध्दती स्वीकारली तरच  जंगल, नदी व सागरातील हरितद्रव्य वाढीला लागून मानवजात व जीवसृष्टीचा काही भाग वाचू शकेल. पूर्ण पृथ्वी ग्रह पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. अगदी सहाराच्या वाळवंटासहित. मानवी भौतिक विकासाला त्यात काही स्थान असू शकत नाही. ते अडिचशे वर्षे दिले ही मानवाची कधीही माफ न होणारी भयंकर चूक आहे. ऐतिहासिक शब्द वापरत नाही. कारण पुढे इतिहास नसणार. मानव नसणार.

अॅड. गिरीश वि. राऊत

निमंत्रक

भारतीय जीवन व पर्यावरण चळवळ

९८६९ ०२३ १२७

COMMENTS