घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये – उद्धव ठाकरे

घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये – उद्धव ठाकरे

मुंबई- आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केली. 
अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर स्वगृही शिवसेनेत परत आले आहेेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. या सर्व नगरसेवकांच्या प्रवेशाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.

घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना लगावला आहे. शिवसेनेने तीन कोटी रुपये मोजून नगरसेवक विकत घेतल्याचा सनसनाटी आरोप सोमय्यांनी केला होता. ‘एका दिवसात शिवसेना इतकी जमवाजमव करत असेल, तर ताकदीचा अंदाज आलाच असेल. आता फोडाफोडी झाली नाही, आधी झाली होती, जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आले आहेत.’ असे  ठाकरें म्हणाले.

‘भाजपा आम्हाला मित्र मानत असेल तर आमच्या आनंदात त्यांनी सामिल व्हावे. इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी. कुणाला फटका देण्यासाठी हा निर्णय नाही,  हे सर्व आपल्या स्वगृही परत आले आहे. भाजप आम्हाला मित्रपक्ष मानत असतील, तर भाजपला पोटदुखी कशाला? असा सवाल ही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

 

COMMENTS