महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस

महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस

मुंबई : पहिल्या टप्प्याच्या कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानले जात आहे.

राजेश टोपे म्हणाले की, “मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांना अपलोड केले. त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली आहे. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत.

पुढे बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, “महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या वतीनं 9 लाख 63 हजार लसींचा डोस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पण तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राला सतरा ते साडेसतरा लाख लसींच्या डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख लसींचे डोस दाखल झाले आहेत.” पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण दोन लसींचे डोस द्या. त्यामुळे राज्याच्या क्षमतेनुसार, आपल्याकडे 55 टक्के डोस आलेले आहेत. त्यामुळे ज्या 8 लाख लोकांना आम्हाला लसीकरणं करायचं आहे. त्याच्या 55 टक्के म्हणजेच, साधारण 5 लाखांपर्यंत आम्ही लसीकरण पूर्ण करणार आहोत.”

COMMENTS