महाविकास आघाडीचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी!

महाविकास आघाडीचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी!

मुंबई – राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. शनिवारी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणाला वेगळच वळण मिळालं. 30 नोव्हेंबरपर्यंत बहूमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला वेळ दिली आहे. परंतु यापूर्वीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजही पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आम्ही निमंत्रीत करावे असं या पत्रात म्हटलं आहे.

जयंत पाटील, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन हे पत्र दिलं आहे.162 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, समाजवादी, अपक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतो. बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करण्याचा कारण नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही सरकार स्थापन करू शकू. फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीला धरून नाही असही शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या समर्थक आमदारांच्या बळावर भाजपने सत्ता स्थापन केली असली तरी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात भाजपची कसोटी आहे. स्वपक्षाचे 106 आमदार आणि 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा अशी आकडेमोड भाजप करत आहे. दुसरीकडे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीने सादर केलेल्या पत्रावर मात्र पक्षाच्या 41 आमदारांच्या सह्या आहेत. यामुळे 13 आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असतील तर भाजपकडील संख्याबळ 133 पर्यंत पोहोचते. त्यातच छोटे पक्ष आणि अपक्ष अशा उर्वरीत 14 पैकी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.

 

COMMENTS