मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न !

मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न !

अकोला – संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम दिसून येतोय. घोषणा, आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणच्या तोडफोडीच्या घटनांनी राज्यभरात या बंदची विविध रुपं पाहायला मिळाली. मात्र, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये या आंदोलनाचं एक वेगळंच रुप पहायला मिळालं. मराठा समाजाच्या मागण्या आणि एकीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेलं होतं. मात्र आज तेच आंदोलनाचं ठिकाण मंगलाष्टकांच्या मंजुळ स्वरांनी निनादलं.

ज्या आंदोलनस्थळी सरकारकडे मागण्यांचं दान मागितलं जात होतं, तिथेच प्रत्येक आंदोलक वधू-वरांना भावी आयुष्यांसाठी शुभेच्छा आणि आशिर्वांदाचं दान देत होतं.अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडेचा विवाह आज अकोला तालुक्यातील गांधीग्रामच्या अभिमन्यू अढावसोबत होता. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनमध्ये हा विवाह आयोजित करण्यात आला होता. या लग्नासाठी दोन्हीकडील पाहुणेमंडळी उपस्थित होते.

वधू तेजस्विनी आणि वर अभिमन्यूसह दोन्हीकडील मंडळींनी लग्नाआधी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यातूनच पुढे आंदोलनस्थळीच लग्न लावण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळी आणि पाहुण्यांनी घेतला.वधू-वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घोषणाही दिल्या. त्यानंतर गडबड सुरु झाली लग्नसोहळ्याची.

आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टकं सुरु झाली. मराठा समाज आणि आंदोलकांच्या साक्षीनं अभिमन्यू आणि तेजस्विनी वैवाहिक जीवनाच्या सूत्रात बांधले गेले. आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाची अनेक ऐतिहासिक रुपं अख्ख्या माहाराष्ट्रानं, जगानं अनुभवली आहेत. मात्र, आजचं हे अकोटमधील लग्नाचं रुप या सर्व रुपांपेक्षा काहीसं वेगळं आणि भावनिक म्हणावं लागेल

COMMENTS