आदित्य यांच्या खेळीने काकांच्या पत्रावर पाणी

आदित्य यांच्या खेळीने काकांच्या पत्रावर पाणी

मुंबई – शिवाजी पार्क मैदानाच्या जलसंचयन नूतनीकरण प्रकल्पाच्या कामाची निविदा थांबवून त्या ठिकाणी सीएसआरचा वापरू करून नाशिक पॅटर्न राबवावा, असे पत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पत्रावर पाणी सोडले असून मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात भविष्यात मनसे विरुध्द शिवसेनेचा शिवाजी पार्कवर सामना रंगणार आहे.

शिवाजी पार्क नूतनीकरणाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया थांबवण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहित विनंती केली होती. आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया थांबवा. यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणीही या पत्रानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. त्यावर शिवसेनेकडून या प्रकल्पाच्या कामाची लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्क प्रकल्पाबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेत प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिवाजी पार्कमधील या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना-मनसे यांच्यात खडाजंगीला सुरुवात झाली आहे. साहजिकच मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच शिवाजीपार्क परिसरात शिवसेना आणि मनसे यांच्यातील सामना रंगायला सुरुवात झाली आहे.

COMMENTS