पंतप्रधान खोटं बोलतात – नाना पटोले

पंतप्रधान खोटं बोलतात – नाना पटोले

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलले ही नवीन बातमी आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून ते संसदेऐवजी निवडणूक प्रचारांच्या सभांमध्येच बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे उदाहरण देतात, मग जीएसटीचा जो कायदा मनमोहन सिंग आणू पाहत होते त्यात बदल करून त्याला मोदींनी गब्बरसिंह टॅक्स का बनवले? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा निशाणाच काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साधला.

नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर नाना पटोले माध्यमांशी बोलत होते. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी आध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी मंत्री बाबा सिद्दीकी उपस्थित होते. या बैठकीत १२ तारखेला होणाऱ्या पदग्रहण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ऑगस्ट क्रांती मैदानात समारंभपूर्व पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

पटोले म्हणाले, मोदी सरकारच्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ७० दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरुद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतकऱ्यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ.

एक काळ होता जेव्हा अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना ते सांगतील तसे वागायला लावतात अशी चर्चा होती पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलीत करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करत आहे. सरकारही अंडरवर्ल्ड प्रमाणे वागत आहे ही बाब गंभीर आहे, असे पटोले म्हणाले.

COMMENTS