नाना पटोले यांच्या हाती आता महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र

नाना पटोले यांच्या हाती आता महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र

मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावर आज अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नाना पटोले यांची वर्णी लागली. त्यांच्यासह ६ कार्याध्यक्ष आणि १० उपाध्यक्षांची निवड आज हायकमांडने जाहीर केली. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रदेश अध्यक्षपद कोणाला मिळणार याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसनं राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. यात अनेक नावे स्पर्धेत होती. मात्र, नाना पटोले यांच्यावर विश्वास काँग्रेसने दाखवला आहे. नाना पटोले यांच्या हाती आता महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र असणार आहेत.

काल नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते अध्यक्ष असतील असे निश्चित झाले होते. त्यानंतर आज सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी पत्रक काढून काँग्रेसची नवी टीम जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू होती. यात अनेक नाव आघाडीवर होती. अखेर प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.या टिमचा कॅप्टन म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारी अध्यक्षपदासाठी शिवाजी मोघे (यवतमाळ), बस्वराज पाटील (उस्मानाबाद), नसीम खान (मुंबई), कुणाल पाटील (धुळे), चंद्रकांत हंडोरे (मुंबई), प्रणिती शिंदे (सोलापूर) तर प्रदेश उपाध्यक्ष पदावर शिरीष चौधरी (जळगाव), रमेश बागवे (पुणे), हुसैन दलवाई (मुंबई), मोहन जोशी (पुणे), रणजीत कांबळे (वर्धा), कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद), बी. आय. नगराळे, शरद अहेर (नाशिक), एम. एम. शेख (औरंगाबाद), माणिकराव जगताप (रायगड) यांची निवड केली.

COMMENTS