पार्थची उमेदवारी तथ्यहीन

पार्थची उमेदवारी तथ्यहीन

सोलापूर- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांचा आपली स्पष्ट करत हे वृत्त तथ्यहीन असून ते तात्काळ थांबवावे,असे आवाहन केले.

यावेळी अजित पवार म्हणाले,“पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भारत भालके यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमदेवारी द्यावी,अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

COMMENTS