“फडणवीस सरकारच्या कार्यकाळात टँकर घोटाळा” रोहित पवारांच्या आरोपाची चौकशी करणार – हसन मुश्रीफ

“फडणवीस सरकारच्या कार्यकाळात टँकर घोटाळा” रोहित पवारांच्या आरोपाची चौकशी करणार – हसन मुश्रीफ

अहमदनगर – फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अहमदनगरमध्ये टँकर घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर रोहित पवारांच्या तक्रारीची चौकशी करणार असल्याचं अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामं, टँकर पाणीपुरवठा, तसेच चारा छावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार रोहित पवार यांनी केली होती. या तिन्ही आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

COMMENTS