उद्धव ठाकरे म्हणजे ‘मिस्टर सत्यवादी’

उद्धव ठाकरे म्हणजे ‘मिस्टर सत्यवादी’

मुंबई – पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर दोन दिवसांनी १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर भाजपने दुसरा आवाज वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला. भाजपच्या चित्रा वाघ या गेल्या तीन ते चार दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. संजय राठोड हे पंधरा दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते २३ फेब्रुवारीला पोहरादेवी या ठिकाणी गेले होते. तिथे मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं. ज्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकाराने कडक निर्बंध घातले असताना राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केल्याने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं उल्लंघन झालं. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्रीही नाराज झाले.

यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत, मी त्यांना ‘मिस्टर सत्यवादी’ म्हणतो. अशी प्रतिक्रया दिली. राऊत म्हणाले, पूजा चव्हाण प्रकरणात तपास सुरू आहे. भाजपकडून आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून काही आरोपही केले जात आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते कधीही कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं. खुर्ची इतकी महत्त्वाची झाली आहे का? उद्धव ठाकरे तुम्ही संवेदनशील आहात योग्य निर्णय घ्याल असं चित्रा वाघ म्हणाल्या. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS