जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी – शरद पवार

जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी – शरद पवार

मंडणगड, दापोली तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर शरद पवारांनी साधला माध्यमांशी संवाद...

रत्नागिरी (दापोली) – नुकसान झालेल्या विभागाची पाहणी केली असता संपूर्ण यंत्रणा सगळ्याच ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे अजूनही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यात फळबागा, शेती, घरे याची नुकसान झाले आहे. याचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दापोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आंबा, नारळ, सुपारी या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देताना पुढील ७ – ८ वर्षाचा विचार करून द्यायला हवी असेही शरद पवार म्हणाले.

बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या बागायती जमीनी साफ करायची देखील मोठी अडचण आहे. रोजगार हमीतून फळबाग उत्पादन करण्याची ही योजना पुन्हा लागू केली तर इथला शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज काही शेतकऱ्यांनी काढले आहे. आता हे कर्ज फेडण्याची क्षमता सद्या तरी दिसत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली सविस्तर माहिती सरपंच किवा नगरसेवकांना द्यावी. या बँकांच्या प्रमुखांची बैठक घेऊन काही सवलत मिळावी याबद्दलचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उद्याच याबद्दलची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्याचा योग्य निर्णय घेतला जाईल. यामध्ये गरज भासल्यास केंद्राकडे जाऊन मदतीची मागणी करू यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतील असेही शरद पवार यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळाने सगळ्या भागात नुकसान झाले असतानाही इथला माणूस खचून गेला नाही तर पुन्हा कामाला लागला आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक नुकसान झाले आहे. या क्षेत्राला उभारी देण्याचा विचार केला जाईल असा विश्वासही शरद पवार यांनी कोकणवासीयांना दिला.

दरम्यान पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला तर भारतातील नामांकित विद्यापीठे, तसेच जगातील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील तर शासनाने घेतलेला निर्णय त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं आहे होत असं नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते असा टोला शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

COMMENTS