माझा पराभव राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हेंमुळे झाला नाही -शिवाजीराव आढळराव पाटील

माझा पराभव राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हेंमुळे झाला नाही -शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे –  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, त्याने माझ्यावर टीका करणं बरोबर नाही, अजित पवारला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही. तेव्हा चेहरा कुणाचा काळवंडलाय हे अख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मी राजकारणात स्वतःच्या हिंमतीवर आलोय, माझे चुलते मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री नव्हते. बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांचं घ्यायचं, हे कुठलं राजकारण?’ असा सवाल करत आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवावरून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली होती.पराभवामुळे माझा चेहरा काळवंडला असून माझी मस्ती जिरली, हे मी वर्तमानपत्रात वाचले. परंतु, राज्यातील शेमडं पोरं पण सांगेल, कुणाची मस्ती जिरली. ज्या माणसाला स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही, अशा वाचाळवीराने माझ्यावर बोलणे विनोदच असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. माझा पराभव करण्याची हिंमत राष्ट्रवादीमध्ये कधीही नव्हती. याआधीत तीन वेळा राष्ट्रवादीला माझा पराभव कऱण्यात अपयश आले. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हे यांच्यामुळे झाला नसून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेमुळे झाल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला यावेळी केला आहे.

COMMENTS